पंढरपूर (दि,18):- भारताच्या आगामी 2027 च्या जनगणनेचा पहिला टप्पा असलेला 'घर यादी व घरगणना' कार्यक्रम 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राबविली जाणार असून, नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
जनगणनेचे प्रत्यक्ष कामकाज करणेकरीता तालुक्यात 85 पर्यवेक्षक व 558 प्रगणकांची नियुक्ती करणेत आलेली आहे या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक घराची पाहणी आणि प्रत्येक व्यक्तीची नोंदणी केली जात आहे. नागरिकांकडून मिळणारी माहिती पूर्णपणे सुरक्षित व गोपनीय ठेवली जाईल, 'अचूक जनगणना-सक्षम भारताची पायाभरणी' हे ब्रीद घेऊन ही मोहीम राबवली जात आहे.
जनगणना संचालनालय सह संचालक रमेश भोसले यांनी वाखरी येथे प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जनगणना सांख्यिकी अधिकारी अजित भांड, सहाय्यक महसूल अधिकारी प्रवीण पवार, महसूल सहाय्यक सागर चंदनशिवे उपस्थित होते.
"जनगणना 2027 साठी एप्रिल 2026 पासून घरगणनेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्यात प्रत्येक घर, झोपडी, फ्लॅटला युनिक घर क्रमांक दिला जाईल. मौजे वाखरी येथून कामास सुरुवात केली असल्याचे यावेळी सह संचालक रमेश भोसले यांनी सांगितले. "घर क्रमांक देताना एकही घर सुटता कामा नये. 2027 ची जनगणना अचूक होण्यासाठी घरगणना हा पाया आहे." असे सांख्यिकी अधिकारी अजित भांड यांनी प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
जनगणनेसाठी नागरीकांनी प्रगणकांना आवश्यक व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे.
000000000
