*बारा बलुतेदार-अलुतेदारांची व्यथा; परंपरा टिकवताना संघर्ष तीव्र.* सुदर्शन बोराडे

लातूर, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा कणा मानल्या जाणाऱ्या बारा बलुतेदार-अलुतेदार समाजाची अवस्था आज अत्यंत बिकट झाल्याचे चित्र समोर येत आहे. परंपरागत कौशल्य, मेहनत आणि गावसेवा यावर उभा असलेला हा समाज आज आधुनिकतेच्या लाटेत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करत आहे. पूर्वी गावातील प्रत्येक कामासाठी बलुतेदारांवर अवलंबून राहणारी व्यवस्था होती. सोनार, सुतार, लोहार, कुंभार, न्हावी, धोबी, गुरव, ताम्रकार, शिल्पकार अशा अनेक घटकांनी गावाची आर्थिक आणि सामाजिक रचना सक्षम केली होती. मात्र बदलत्या काळात या पारंपरिक व्यवसायांना मागणी कमी होत गेली आणि त्यामुळे या समाजावर आर्थिक संकट ओढवले. सध्या या समाजातील अनेक कुटुंबांना रोजगाराचा अभाव, शिक्षणातील अडचणी, तसेच सरकारी योजनांचा अपुरा लाभ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या विविध योजना अस्तित्वात असल्या तरी त्या तळागाळापर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. तरुण पिढी पारंपरिक व्यवसाय सोडून अन्य रोजगाराच्या शोधात स्थलांतर करत आहे. त्यामुळे शतकानुशतके चालत आलेली कौशल्ये आणि परंपरा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर बारा बलुतेदार-अलुतेदार समाजासाठी स्वतंत्र धोरण राबविण्याची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात बारा बलुतेदार-अलुतेदार विकास परिषद, महाराष्ट्र राज्यचे मराठवाडा अध्यक्ष सुदर्शन बोराडे यांनी सांगितले की, “हा समाज केवळ इतिहासाचा भाग नसून तो आपल्या संस्कृतीचा जिवंत वारसा आहे. या समाजाच्या विकासासाठी शासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण केंद्रे आणि बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास या समाजाचे जीवनमान सुधारू शकते.” एकूणच, बारा बलुतेदार-अलुतेदार समाजाच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या विकासासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form