* धार्मिक व जातीय सलोखा कायम ठेवावा *पुतळ्याच्या देखभालीची व पावित्र्य
राखण्याची संबंधित संस्थेची जबाबदारी
पंढरपूर -(दि:-07):- राष्ट्रपुरुष व थोर
व्यक्तींचे पुतळे उभारण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली
असून, महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची
मान्यता घ्यावी लागेल. कोणतीही व्यक्ती संघटना संस्था किंवा खाजगी मालकीच्या जागेवर
जिल्हाधिकारी यांच्या परवानगीशिवाय पुतळा उभा करू शकणार नाही. पूर्व परवानगी शिवाय
पुतळा उभारल्यास संबंधित व्यक्ती, संस्था किंवा समितीवर दंडात्मक कारवाई यासोबतच
कायदेशीर कारवाई येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.
राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींचे पुतळे उभारण्याबाबतच्या मार्गदर्शनासाठी पोलीस
संकुल, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस सहा. पोलीस अधिक्षक
प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, पोलीस निरीक्षक
टी.वाय.मुजावर, सहा. पोलीस निरिक्षक श्री गोसावी, योगेश लंगुटे, तसेच तालुक्यातील
मंडल अधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व पदाधिकारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी श्री.इथापे म्हणाले, राज्यातील विविध गावांत
महापुरुषांचे पुतळे उभारले जातात. या महापुरुषांच्या महान कार्याचे कायम स्मरण
व्हावे आणि त्यातून नवीन पिढीने प्रेरणा घ्यावी हा त्यामागचा उद्देश आहे. परवनगी
घेवून पुतळा उभारण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळेल. यासाठी
राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारायचा असलेल्या जागेच्या मालकीहक्काबाबत वाद असता कामा
नये, सदर जागा अनधिकृत नसावी, पुतळा उभारल्यामुळे संबंधित शहर किंवा गावाच्या
सौंदर्याला बाधा येणार नाही याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होणार नाही याची
खबरदारी घ्यावी, पुतळ्याच्या देखभालीची आणि पावित्र्य राखण्याची जबाबदारी संबंधित
संस्थेला घ्यावी लागेल. केवळ परवानगी घेऊनच पुतळा उभारून चालणार नाही तर त्याची
देखभाल करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. पुतळा उभारणारे संस्थेने पुतळ्याच्या
क्ले मॉडेल ला कलासंचालनालयाची मान्यता घेऊनच पुतळा तयार करावा. मान्यता केलेल्या
मॉडेल प्रमाणेच पुतळा उभारण्याची दक्षता घ्यावी.तसेच महाराष्ट्र हे थोर
समाजसुधारकांच्या विचार व कार्याचे परंपरा लाभलेले राज्य आहे. नागरिकांनी धर्म
जातपंथांचा नेहमी आदर करून जातीय सलोखा कायम ठेवावा, असे आवाहन प्रांताधिकारी
श्री.इथापे यांनी केले. यावेळी सहा.पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे म्हणाले, अनधिकृत
पुतळा उभारण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पुतळा उभारण्याबाबत आवश्यक परवानगी
घ्यावी. पोलीस पाटील हे ग्रामस्थ आणि प्रशासनाचा दुवा आहे त्यांनी गावात अनधिकृतपणे
पुतळा बसवण्यात येणार असल्याची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी. चुकीच्या
पद्धतीने पुतळे उभारल्यास कायमचे नुकसान आहे ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात येणार आहे
त्या ठिकाणी तो उभारण्यासाठी आवश्यकता परवानगी घेणे आवश्यक आहे. पुतळा उभारल्यामुळे
वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. चुकीच्या पद्धतीने पुतळा
उभारणाऱ्या युवा वर्गावर एकदा गुन्हा दाखल झाला तर युवा वर्गाचे भविष्य कायमचे खराब
होते त्यामुळे पुतळा उभारताना आवश्यक त्या परवानग्या घेऊनच पुतळा उभारावा. पुतळे
उभारण्याबाबत परवानगी मागणाऱ्या संस्था नोंदणीकृत असणं आवश्यक आहे.पुतळा
उभारण्यामुळे गावात कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होणार नाही याची दक्षता
घ्यावी.पुतळा उभारलेल्या जागेचा वापर अन्य कामांसाठी करण्याचा अधिकार पुतळा
उभारणाऱ्यांना असणार नाही. उभारण्यात आलेल्या पुतळ्याचे पावित्र्य व सुरक्षितता
राखावी असे तहसीलदार लंगुटे यांनी सांगितले. महापुरुषांनी समाज उभा करण्याचे काम
केले आहे तसेच समाज व्यवस्था कशी चांगली राहील याची काळजी घेतली. महापुरुषांचे
विचार आपण जीवनात रुजवावेत असे गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले.
00000000000000000

