सोलापूर प्रतिनिधी --
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे घडलेल्या अत्यंत अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे समाजमन हादरले आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि निर्दयी हत्येच्या घटनेबद्दल सोलापूर येथील समस्त सोनार सामाजिक संघटनांनी व समिती तर्फे तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संतापजनक घटनेतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज २१ रोजी विविध मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे.
सदर घटना समाजाच्या सुरक्षिततेवर गंडांतर आणणारी असून, समाजमन अस्वस्थ झाल्याची भावना समाजाने व्यक्त केली. अत्याचार व हत्येचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून, अल्पावधीत निकाल जाहीर करावा, पीडित परिवारास शासनामार्फत योग्य आर्थिक मदत, संरक्षण आणि आवश्यक त्या सर्व सुविधा तत्काळ पुरवाव्यात, अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी सुवर्णकार समाज सोलापूर अध्यक्ष व शिवसेना शहर अध्यक्ष महेश धाराशिवकर, जेष्ठ ओबीसी नेते ॲड.राजन दिक्षित, राज्य ओबीसी महिला प्रमुख डॉ.माधुरी परपल्लीवर, जिल्हा सोनार महिला अध्यक्ष माधुरी डहाळे,युवा अध्यक्ष शहाणे, पल्लवी सुरवसे, कुलकर्णी,आर एच डहाळे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.