गावातील दारूबंदी आणि पाणीपुरवठ्याचे काम पूर्ण करण्याची मागणी
पंढरपूर /प्रतिनिधी--
आपलं गाव आपली जबाबदारी विकासही आपली तयारी हे ब्रीदवाक्य घेऊन गावातील विविध प्रश्नांबाबत लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच संजय साठे यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
जोपर्यंत गावाला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही तसेच दारू आणि ताडीच्या आस्थापना बंद होत नाहीत तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असूनही शिवसेनेच्या सरपंचाला निष्क्रिय प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे.
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना अनेक वर्षांपासून भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने शिवसेनेचे नेते महेश साठे यांच्या प्रयत्नातून विशेष बाबा म्हणून योजना मंजूर करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून हाती घेण्यात आले होते. मात्र गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पाईपलाईन काही नागरिकांनी अडविल्याने सदरचे काम संत गतीने सुरू आहे. याबाबत सरपंच संजय साठे यांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. हे काम तात्काळ सुरू करावे. तसेच ग्रामपंचायत हद्दीतील दारूबंदी बाबत ग्रामपंचायतीचा ठराव करूनही बिअर शॉपी, ताडी दुकाने गेली चार महिन्यांपासून सुरूच आहेत. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने कोणतीही कारवाई न केल्याने ग्रामस्थांचा विरोध वाढू लागल्याने याचबरोबर महिलांमध्ये पसरत चाललेली अस्वस्थता जाणून घेऊन गावचा सामाजिक आणि नैतिक ऱ्हास होत असल्याने गावचा प्रथम नागरिक म्हणून शिवसेनेचे सरपंच संजय साठे यांना निष्क्रिय प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची वेळ आली आहे. याबाबत प्रशासन काय भूमिका घेणार? याकडे नागरिकांची लक्ष लागले आहे.
Tags
सामाजिक वार्ता