प्रसंगी अभिजित पाटील यांच्याशी मिळून निवडणुकीत उतरणार सह.शिरोमणी कारखाना वाचवण्यासाठी प्रयत्न ---
ॲड. पवार यांनी पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट
पंढरपूर ---(विनोद पोतदार)
चंद्रभागा कारखान्याची मागील पंचवार्षिक निवडणुक लढविली होती. त्यावेळी २२०० सभासदांनी आपल्यावर विश्वास टाकला होता. यामुळे आगामी निवडणुकीत आपण स्वतः नसलो तरी केवळ विद्यमान चेअरमन कल्याणराव काळे यांना बाजूला सारण्यासाठी ही निवडणुक लढविणार असल्याचे जाहीर केले. प्रसंगी विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या सोबत राहून आपण या निवडणुकीत उतरू. संस्थेच्या हितासाठी सत्तांतर महत्वाचे आहे. निवडणुकीतील नेतृत्वासाठी स्पर्धा न करता एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय ॲड. दिपक पवार यांनी घेतला असल्याचे जाहिर केले.
गेली बावीस वर्षे चेअरमन असूनही कल्याणराव काळे यांनी सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेने उसाला भाव दिला नाही. एफआरपीची रक्कम कधीही वेळेत दिली नाही. २०१९ सालची एफआरपी यावर्षी पूर्ण केली. मागील वर्षी ४ लाख टन ऊस गाळप करूनही यंदा दिवाळीला सभासदांना साखर दिली नाही. सलग तीन वर्षे आरआरसीची कारवाई होणारा सहकार शिरोमणी हा राज्यातील एकमेव कारखाना आहे. १६ महिने झाले कामगारांचे पगार दिले नाहीत. त्यांना वेज बोर्ड लागू केले नाही. कारखान्याशी सलग्न बझार आणि पतसंस्था मोडकळीस आणल्या. त्यामुळे यावर्षी सहकार शिरोमणी साखर कारखाना कल्याणराव काळे यांच्यापासून मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत ॲड. दीपक पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
पुढे पवार म्हणाले, सीताराम साखर कारखान्यासाठी ज्या सभासदांचे पैसे
कपात केले आहेत, त्यांना ते परत मिळावेत यासाठी १० ऑक्टोंबर २०२१ रोजी सेबी, इनकम टॅक्स, कंपनी कार्यालय, पोलिस, ईडी यांच्याकडे तक्रार केली होती. सर्व गुंतवणुकदारांचे पैसे परत देण्यासाठी लढाही उभा केला होता. त्यानंतर ३० ऑक्टोंबर रोजी चेअरमन काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन ६ महिन्यात सर्व गुणतवणुक दारांचा सर्व पैसा देणार असल्याचे आश्वासन दिले होते. आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यांनी जाहीर केलेल्या घोषणेचे काय झाले, असा प्रश्न पवार यानी उपस्थित केला.
सीताराम साखर कारखान्याच्या गुंतवणुकदारांचा मेळावा घेतला असता जवळपास एक हजार लोकांचे तक्रारी अर्ज पोलिसांसह सर्व संबंधीत विभागाकडे दिले होते. मागील वर्षात जवळपास दिड हजार लोकांचा पैसा परत देण्याचा फार्स केला आहे. केवळ तपास यंत्रणांची दिशाभूल व्हावी म्हणून त्यांनी मागणी अर्ज घेण्याचे नाटक केले आहे. परंतु सर्व गुंतवणुकदारांचे व्याजासह पैसे मिळावेत अशी आपली आजही मागणी असल्याचे पवार म्हणाले. तक्रारीनुसार तपास अंतिम टप्यात आला आहे. लवकरच सर्वांना न्याय मिळेल. अन्यथा गप्प बसणार नसल्याचे दिपक पवार म्हणाले. वरील सर्व प्रकार पाहता कारखान्यावरील कारभार कसा चालू आहे. हे आता सभासद, कामगारांनी ओळखले असुन आगामी निवडणुकीत हेच सभासद विद्यमान संचालक मंडळाला जागा दाखवतील असे ते म्हणाले.