*तालुका प्रशासनाकडून आयोजन; विद्यार्थी,नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग
पंढरपूर, दि. 13 : नागरिकांमध्ये राष्ट्राभिमान, देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा ज्वाजल्य इतिहासाचे सर्व नागरिकांना स्मरण व्हावे, देशाच्या राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान, अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, तसेच स्वातंत्र्यलढ्यातील वीर स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग व बलिदानाचे स्मरण पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने पंढरपूर तालुका प्रशासनाकडून भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या पदयात्रेत हातात तिरंगा आणि मनात राष्ट्रभक्तीची भावना घेऊन पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी , विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तिरंग्याच्या सन्मानार्थ दिलेल्या घोषणांनी आणि देशभक्तीच्या उत्साहाने संपूर्ण परिसर राष्ट्रप्रेमाने भारावून गेला. या तिरंगा पदयात्रेच्या माध्यमातून राष्ट्राची एकता, अखंडता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरु झालेली तिरंगा पदयात्रा चौफाळा - नाथ चौक - तांबडा मारुती - महाद्वार - कालिका माता मंदिर - काळा मारुती -चौफाळा मार्गे येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समारोप करण्यात आला.
सदर रॅलीमध्ये आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, प्रांताधिकारी सचिन इथापे , सहायक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, तहसिलदार सचिन लंगुटे, भुमी अभिलेख उप अधिक्षिक पुजा आवताडे, तालुका पोलीस निरिक्षक, सुरेश चिल्लावार तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख,अधिकारी-कर्मचारी, नगरसेवक, मान्यवर पदाधिकारी, विविध विद्यालयाचे विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
00000000000


