*माऊलींच्या अश्वाचे उभे रिंगण महत्व नामाचे* आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम तरडगाव

तरडगाव हे फलटण तालुक्यातील अत्यंत पवित्र ठिकाण आहे, आद्य चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाची स्थापना केली, येथे त्यांचा मठ असून नित्य साधना चालू असते. याशिवाय तरडगाव फलटण लोणंद रोडवर माऊलींचे पुरातन मंदिर असून आषाढी वारीतील अत्यंत पवित्र आणि आनंद दायक उत्साहवर्धक सोहळा म्हणजे वारीतील पहिले उभे रिंगण, तरडगाव चांदोबाचा लिंब या ठिकाणी वारकरी एका विशिष्ट पद्धतीने उभे राहून मानाचा अश्व व संतांच्या पादुकांचा मान राखतात, गोल रिंगणाप्रमाणे उभे न राहता समोरासमोर उभे राहून मध्ये एक लांब मार्ग तयार करतात, या मोकळ्या मार्गावरून मानाचा अश्व माऊलींच्या पादुका समोर नतमस्तक होऊन मधील मार्गावरून कोणाला इजा न करता वेगाने धावत जाऊन माऊली समोर नतमस्तक होतात, अश्वाच्या पाठीमागे मानाचे टाळकरी, विणेकरी, हंडा तुळस, घेतलेली महिला, पुरुष भाविक, टाळ वाजवत पळत असतात. मानाचा अश्वावर प्रत्यक्ष माऊली विराजमान असतात, अशी पूर्वीपासून लोकांची श्रद्धा आहे. अश्वाच्या टापा खालची माती प्रसाद म्हणून घेण्यासाठी व कपाळाला लावण्यासाठी लोकांची पाठीमागे गर्दी होते. वारीमध्ये चालताना प्रचंड ऊन आणि पाऊस यामुळे आलेला थकवा या क्षणी त्वरित दूर होतो. चालण्यासाठी नवी शक्ती व ऊर्जा मिळते हे माऊली माऊली या नामाचे महत्त्व आहे *माऊलींनी राम कृष्ण हरी हा मंत्र दिला* *प्रभू राम नाम* *प्रभू श्रीरामाचे गुण, चरित्र, आणि नाम, याचे गुणगान करणारे नामदेवरायांचे अनेक अभंग आहेत, प्रभू रामचंद्रांचा अवतार आधी, की राम नाम आधी, वाल्मिकीने रामायणाची रचना आधी केली, आणि त्यानंतर श्रीरामाचा अवतार झाला, वाल्मिकीने घालून दिलेल्या मर्यादेत राहुन त्याला आपले चरित्र घडवावे लागले, म्हणून रामाचे वर्णन मर्यादा पुरुषोत्तम असे केले जाते.* वाल्मिकीने रामायण रचल्यानंतर जर श्रीरामाचा अवतार झाला असेल तर, वाल्याचा, वाल्मिकी ज्या राम नामाच्या जपाने झाला, ते नाम कुठून आले, तो बीज मंत्र आहे. नामदेव राय म्हणतात...... *शंभू उपदेशी भवानीशी रामनामे जपे मानसी* *दोन्ही अक्षरे रसाळ महापातकां करी निराळे* *बीज मंत्र रामनाम फळ शतकोटी रामायण* *नामा विनविता रघुनंदना विनती परिसा दशरथनंदना* शिव पार्वतीला उपदेश करतात, तू मनाने राम नामाचा जप कर, राम ही दोन्ही अक्षरे अमृताप्रमाणे रसाळ आहेत, ती महापातकांना दूर करतात, राम नाम हा बीज मंत्र आहे, *ज्यापासून सर्व विश्वाची निर्मिती झाली, त्याच्या नामाचा उच्चार केल्याने, शतकोटी राम नामाचा पाठ पुण्य मिळते* नामदेवराय म्हणतात, हे रघुनंदना याप्रमाणे माझा उद्धार करण्याची विनंती ऐका. भगवान शिवानी शतकोटी रामायणाची प्रथम रचना केली, देव दानव, मानव, यांनी भगवानशिवाकडे रामायण मागितले, शतकोटी श्लोक, देव, दानव, व मानव यांच्यामध्ये समान वाटल्यावर शेवटी दोन अक्षरे शिवाने स्वतःकडे ठेवून घेतली, ती राम हा जप भगवान शिवजी करतात. सीतेला रावणाने पळवून नेल्यावर श्रीरामाने मोठा शोक केला, या शोकग्रस्त रामाला पार्वतीने पाहिले, आणि तिला आश्चर्य वाटले, ज्याच्या नामाचा शिवजी जप करतात, तो हाच काय ? परीक्षा घेण्यासाठी पार्वतीने सीतेचे रूप घेतले, व रामा पुढे प्रकट झाली, प्रभू रामचंद्रांनी हसून पार्वती मातेला वंदन केले, पार्वतीला आपली चूक कळली, पण इकडे शिवप्रभू चिडले, पार्वतीला म्हणाले तू सीता म्हणजे माझी माता झालीस, आता मी पत्नी म्हणून तुझा स्वीकार करणार नाही, देवाच्या स्वरूपाविषयी शंका, हे पार्वतीचे महापाप नष्ट होण्याचा उपाय राम नाम जप. पार्वतीने राम नाम स्मरण केलेने पाप नष्ट झाले, पुन्हा शिवपार्वती मिलन झाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी, राम कृष्ण हरी हा बीज मंत्र वारकरी सांप्रदायात रुजू केला‌, सर्वच संतांनी त्यांचे अनुकरण केले. *ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात,* भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होते, दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे ?काळोख्या रात्री जसा काठीचा आधार असतो, तसे संसारात नाम आहे, मोह, लोभ, इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात, आणि दूर करता येतात. उपासना कोणतीही असली तरी नामाशिवाय ते पचनी पडत नाही, म्हणून नामाला महत्त्व आहे. निरनिराळ्या देशातील अन्न नीर निराळे असू शकते, पण ते पचविण्याकरता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच, पाण्याशिवाय कोणतेही अन्न पचणार नाही, त्याप्रमाणे पचविण्यासाठी नामरुपी पाण्याची जरुरी आहे, म्हणून नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यास करावा, कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका, त्यातूनच परमात्मा प्राप्त होईल. जय श्रीराम ..*जय जय राम कृष्ण हरी*..🙏🏻 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷 *श्री रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फो.९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form