मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर येथील सर्व सदस्यांना १० लाखांचे विमा कवच
पंढरपूर / प्रतिनिधी
पत्रकारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला प्राधान्य देत मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र शाखा पंढरपूरच्या वतीने शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाती उघडून बजाज अलायन्स कंपनीचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला. विशेष म्हणजे, पत्रकार बांधवांसाठी राबविण्यात आलेला हा राज्यातील पहिलाच उपक्रम असून त्याची सुरुवात विठुरायाच्या पंढरपूर नगरीतून करण्यात आली असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी दिली.
पंढरपूर येथील पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे आयोजन मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष अपराजित सर्वगोड आणि तालुकाध्यक्ष मिलिंद यादव यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते.
यावेळी पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार, पंढरपूरचे पोस्टमास्टर सोमनाथ गायकवाड तसेच जागतिक मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्याण कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या प्रतिभेचे पूजन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमात पंढरपूर डाक विभागाचे अधीक्षक मुन्ना कुमार आणि पंढरपूरचे पोस्टमास्तर सोमनाथ गायकवाड यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विविध सेवा, बचत व विमा योजना तसेच भारतीय डाक विभागामार्फत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. पत्रकारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'डाक चौपाल' उपक्रमाअंतर्गत उपलब्ध सुविधा आणि योजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
पत्रकारांना आर्थिक संरक्षण मिळावे, त्यांच्या कुटुंबाला संकटकाळात आधार मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंढरपूरातून सुरू झालेला हा उपक्रम राज्यातील इतर जिल्ह्यांसाठीही आदर्श ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
याप्रसंगी विनोद पोतदार, दत्ता पाटील, राजकुमार शहापूरकर, रामकृष्ण बिडकर, संतोष कसगावडे, कबीर देवकुळे, अरुण जाधव, विकास सरवळे, विठ्ठल जाधव, पोस्टमन अमित शिर्के, शशिकांत आयतोडे, आनंदा गाडेकर, सतीश इरकर, राजकुमार मोहिते, विलास सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल माने यांनी केले तर सूत्रसंचालनाची जबाबदारी बालम मुलानी यांनी पार पडली.
