लातुर (प्रतिनिधी) –
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे घडलेल्या अत्यंत अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचे समाजमन हादरले आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि निर्दयी हत्येच्या घटनेबद्दललातूर येथील विविध सामाजिक संघटनांनी व समिती तर्फे तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या संतापजनक घटनेतील दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी आज दि. 19 रोजी विविध संघटनांनी व समिती ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले.लातूर येथील मानव विकास संरक्षण समिती व संघटनांनी एकत्र येत, ही घटना समाजाच्या सुरक्षिततेवर गंडांतर आणणारी असून, समाजमन अस्वस्थ झाल्याची भावना व्यक्त केली. अत्याचार व हत्येचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला त्वरित अटक करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करून, अल्पावधीत निकाल जाहीर करावा, पीडित परिवारास शासनामार्फत योग्य आर्थिक मदत, संरक्षण आणि आवश्यक त्या सर्व सुविधा तत्काळ पुरवाव्यात, अशा मागण्या करण्यात आले आहे.
निवेदनावर हितकारी सभा मानव विकास संरक्षण समिती यासह अनेक समाजबांधवांच्या सह्या आहेत. या सर्व संघटनांनी शासनाने मागण्या मान्य करून लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी केली आहे. आरोपीस शिक्षा नाही झाली तर आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल असे मानव विकास संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष सुदर्शन बोराडे लातूर यांनी सांगितले.
मानव विकास संरक्षण समिती जिल्हाध्यक्ष सुदर्शन बोराडे, शहराध्यक्ष दिलीप पिनाटे, उपाध्यक्ष सुदाम पांचाळ, उपशहराध्यक्ष भागवत पांचाळ, विजयकुमार दीक्षित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण संघटना लातूर जिल्हा अध्यक्ष, भरत पांचाळ याच्यासह आदी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.