माळशिरसच्या वाघमोडे परिवाराने सीमेवरील जवानांना पाठविल्या साडेपाच हजार राख्या,महसूल विभागात सैनिकांच्या कामकाजासाठी प्रथम प्राधान्य दिले जाईल -प्रांताधिकारी विजया पांगरकर

माळशिरस प्रतिनिधी .
सीमेवर सैनिक तैनात असतात म्हणून संपूर्ण देश सुखाची झोप घेऊ शकतो. सैनिक म्हटले की आपल्या शरीरात अद्भुत शक्तीचा संचार निर्माण होतो. आपल्या प्राणाची परवा न करता सैनिक अहोरात्र आपल्या देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर उभा असतो. सण असो वा उत्सव देशसेवा हाच आपला मोठा सण मानणाऱ्या सैनिक बांधव सैनिक बांधवांच्या योगदानाची जाणीव ठेवून आपणही त्यांच्या स्नेह जपायला हवा. त्यांनाही देशातील बहिणींची मायेचा प्रेमळ ओलावा अनुभवता यावा या जाणिवेतून "एक राखी सैनिकांसाठी" ही संकल्पना मनात रुजवून माळशिरस येथील  तानाजी वाघमोडे व शोभा वाघमोडे व त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या स्वतःच्या हाताने तिरंगा कलर मध्ये राख्या तयार करून आपल्या भारत मातेच्या विविध सीमेवरील सैनिकांना पाठविण्याचा कार्यक्रम निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी विजया पांगरकर यांच्या हस्ते माळशिरस पंचायत समिती माळशिरस येथे करण्यात आला. आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या दिवसरात्र देशाच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या सैनिकासाठी माळशिरस मध्ये वाघमोडे कुटुंबीय सैनिका प्रती प्रेम आपुलकी निर्माण व्यक्त करत याही वर्षी प्रेमाचे प्रतीक असलेले राखी देशातील ३५ युनिट मधील जवानांना साडेपाच हजार राख्या पाठविल्या आहेत. सीमेवर कर्तव्यावर असणाऱ्या अथवा निवृत्त सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महसूल विभाग प्रथम सैनिकांना  प्राधान्य दिले जाईल तसा फलकही ही महसूल विभागाच्या बाहेर लावला जाईल असे प्रांताधिकारी विजया पांगरकर यांनी म्हटले. पुढे बोलताना प्रांताधिकारी पांगारकर यांनी वाघमोडे कुटुंबाच्या उपक्रमाचे कौतुक केले तसेच तालुक्यातील प्रत्येक घरातून एक राखी सैनिकांसाठी गोळा केली तर लाखो राख्या माळशिरस तालुक्यातून सीमेवरील सैनिकांना पोहोचतील असे त्यांनी मत व्यक्त केले. सैनिकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रघुनाथ पांढरे कार्यालयातच असून सुद्धा  उपस्थित राहिले नाहीत याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच या कार्यक्रमाला तालुक्यातील इतर अधिकारी जे उपस्थिती नव्हते, त्यांचीही उपस्थिती महत्त्वाची होती असे त्यांनी सांगितले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे ते सैनिकाप्रती भावना शून्य आहेत असे वाटते .पुढे बोलताना पांगरकर म्हणाल्या की या पुढील कार्यक्रमासाठी मी माळशिरस  तालुक्यात नसले तरी मला कळवा मी आवर्जून उपस्थित राहील .अशा कार्यक्रमामुळे सैनिकांच्या भावना थेट काळजापर्यंत पोहोचल्या जातात .मी गेले तीस वर्ष माझ्या भावाला राखी बांधू शकले नाही याचे दुःख वाटते असे त्या म्हणाल्या. 
सुभेदार विजयकुमार सावंत यांनी सैनिकांना रेशन कार्ड, सातबारा, घर त्यांच्या नावावर मिळावे अशी मागणी केली. तसेच त्यांनी वाघमोडे कुटुंबाचे कौतुक केले कोणतेही अपेक्षा न ठेवता गेले सहा वर्षे वाघमोडे कुटुंब सीमेवरील जवानांना राख्या पाठवत आहेत. .घरची परिस्थिती साधारण असूनही सैनिका प्रति भावना जपत हे कुटुंब स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर पाठवत आहे या कार्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले .
मेजर राजेंद्र आढाव यांनी सैनिकाच्या अडचणी सांगितल्या. तसेच ज्या त्या  लेवलला लवकरात लवकर सोडवाव्यात असेही सांगितले. सैनिकांचे कार्य त्यांना येणाऱ्या अडचणी या त्यांनी अनुभवातून सांगितले. ऑन ड्युटी असल्यावर आम्हीच आमचे भाऊ-बहीण  वडील असतो.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीमती विजया पांगरकर ,माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास दिंडूरे एपीआय जानकर, राया ऍग्रो चे मालक शिवाजी गोरड, त्रिदल माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष मेजर राजेंद्र आढाव, ज्येष्ठ सैनिक अधिकारी कप्तान लक्ष्मण माने, सैनिक संघटना तालुका अध्यक्ष नायब सुभेदार सुरेश तोरसे, माजी सैनिक अधिकारी सुभेदार राजू खराडे, सैनिक मित्र सोलापूर एसपी ऑफिस सुभेदार विजयकुमार सावंत, माजी सैनिक मारुती वाघमोडे, बापू वाघमोडे, रत्नप्रभा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोरख जानकर, रत्नप्रभादेवी  बिजो.सह. संस्थेचे उपाध्यक्ष सूजित तरंगे , बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील, पत्रकार आनंद शेंडगे ,संजय हुलगे ,स्वप्निल राऊत, शिवाजी पालवे, कृष्णा लावंड , एडवोकेट रूपाली गोरे ,गोफने मॅडम, वाघमोडे परिवार तसेच माजी सैनिक आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर सावता गोरे यांनी केले तर आभार सुभेदार विजयकुमार सावंत यांनी मांनले
*चौकट*
एक राखी सैनिकांसाठी या उपक्रमांतर्गत सैनिकांना तिरंगा कलर मध्ये स्वतःच्या हाताने राख्या तयार करून पाठवीत असतो. हा उपक्रम कोरोना काळापासून सुरू करण्यात आला. कोरोना काळात सर्व जग एका जागी स्थिर असताना केवळ सीमेवरील सैनिक, पोलीस प्रशासन, डॉक्टर ,नर्स, केमिस्ट अहोरात्र आपले कर्तव्य बजावत होते. आपण सर्वजण प्रत्येक सण आपल्या कुटुंबासोबत मोठ्या आनंदात साजरा करत असतो परंतु सीमेवरील जवानांना कोणतेही सण आपल्या कुटुंबासोबत साजरे करता येत नाही .आपल्या देशातील भाऊ-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण "रक्षाबंधन" हा सण आपण मोठ्या उत्साहात साजरा करत असतो ."रक्षाबंधन" म्हणजे भावाने बहिणीचे रक्षण  करणे. परंतु आपल्या भारत मातेचे खरे रक्षणकर्ते सीमेवरील लढणारे सैनिक आहेत. म्हणजे रक्षाबंधन या सणाचे खरे मानकरी तर सीमेवरील सैनिक आहेत . आपण सैनिकांना सीमेवर राख्या पाठवायच्या का?  ही गोष्ट मी कुटुंबासोबत शेअर केली असता संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिले. सुरुवातीला केवळ ५०० राख्या तयार केल्या होत्या व पाच युनिटला राख्या पाठविण्यात आल्या होत्या  दरवर्षी त्यात वाढ करून यावर्षी म्हणजे २०२५  मध्ये ५,५०० राख्या तयार करण्यात आल्या व जवळपास ३५ युनिटला या राख्या पाठवण्यात आल्या आहेत .राख्या पाठवण्याचे हे ६ वे वर्ष आहे. राख्या मिळाल्यानंतर जवानांच्या आलेल्या प्रतिक्रिया खरच मानसिक समाधान मिळवून देते .यापुढेही माझ्याकडून हे काम चालूच राहील असे ईश्वरचरणी प्रार्थना करते.
सौ.शोभा तानाजी वाघमोडे (पत्रकार,समाजसेविका,माळशिरस)

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form