वारी कालावधीत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून1 हजार 437 गंभीर रुग्णांना अत्यावशक सेवेचा लाभ

 भाविकांना रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा प्रांताधिकारी  इथापे यांनी केला सन्मान
 
पंढरपूर, दि. 23 :-  
 आषाढी यात्रा कालावधीत श्री. विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी  पंढरपूरात सुमारे 15 लाखांहून अधिक भाविक दाखल झाले होते.  यात्रा कालावधीत भाविकांना प्रशासनाकडून सर्व आवश्यक सुविधा देण्यात आल्या होत्या. यात्रा कालावधीत वारकऱ्यांना आरोग्याच्या तात्काळ व दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने  30  रुग्णवाहिका (108) या वारीत  सहभागी झाल्या होत्या. या रुग्णवाहिकेच्या  माध्यमातून वारीत  1 हजार 437 गंभीर रुग्णांना अत्यावशक सेवेचा लाभ झाला. या रुग्णांना तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यास 108 रुग्णवाहिका  यशस्वी ठरली असल्याची माहिती बीव्हीजी 108 रुग्णवाहिकेचे विभागीय व्यवस्थापक विठ्ठल बोडके यांनी सांगितले.
 
आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी  17 रुग्णवाहिका वेगवेगळ्या ठिकाणी थांबवलेल्या होत्या तसेच  11 रुग्णवाहिका आरोग्य शिबीर ठेवण्यात आल्या होत्या तर  रुग्णवाहिका या रिलेसाठी राखीव ठेवलेल्या होत्या अशा एकूण 30 ॲम्बुलन्स च्या माध्यमातून या वर्षी 1 हजार 437 गंभीर रुग्णांना अत्यावशक सेवेचा लाभ झाला. सन 2014 मध्ये  प्रथमच 108 रुग्णवाहिकांनी  वारीमध्ये सेवा दिली. त्यानंतर अव्यातपणे कोणताही खंड पडू न देता वारी कालावधीत  रुग्णवाहिका वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध ठेवण्यात आल्या असल्याचे व्यवस्थापक श्री बोडके यांनी सांगितले.
 या आषाढी यात्रा कालावधीत दरवर्षी पेक्षा  मोठ्या संख्येने वारकरी भाविक आले होते. वारीत आरोग्याची सुविधा कोलमडून न देता चांगल्या रुग्णसेवा देण्याचे काम 108 रुग्णवाहिकेच्या सहाय्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी पार पाडले आहे.यामध्ये रुग्णवाहिका व  त्यावर काम करणारे डॉक्टर, पायलट यांनी वारी काळामध्ये उल्लेखनीय काम केले असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश सुडके यांनी सांगितले.  तसेच   सोलापूर जिल्हा  को-ऑर्डिनेटर डॉ. अनिल काळे व सांगली जिल्हा को-ऑर्डिनेटर डॉ. कौस्तुभ घाटूळे यांचे यावेळी  त्यांनी कौतुकही केले.
 
भाविकांना रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा प्रांताधिकारी  इथापे यांनी केला सन्मान

आषाढी यात्रा कालावधीत श्री. विठ्ठलरुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी  पंढरपूरात आलेल्या भाविकांना तसेच पालखी मार्गावर 108 रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर, रुग्णवाहिका चालक, कर्मचारी यांचा सत्कार प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी  प्रांताधिकारी इथापे म्हणाले, आषाढी वारी सोहळा नुकताच निर्विघ्नपणे पार पडत असताना 108 रुग्णवाहिका गेली अकरा वर्ष पालख्या जागेवरून निघाल्यापासून ते गोपाळकाल्यापर्यंत सेवा देत असतात यामध्ये पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून देणे त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी आपत्कालीन समस्या उभी राहिल्यास  योग्य ती मदत करणे,अशा पद्धतीचे काम 108 रुग्णवाहिका गेल्या अकरा वर्षापासून काम करत आहेत. या रुग्णवाहिकेवर काम करणारे  डॉक्टर ,पायलट व ई.आर.ओ यांचे अव्यातपणे ,अखंड काम चालू असते परंतु हे काम कोणाला दिसत नसते. त्यांचे मानावे तेवढे आभार थोडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमचे टीम मॅनेजर ऋषिकेश जोशी त्याचबरोबर पुणे,लातूर,धाराशिव,सातारा,सोलापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व  (इ.एम.एस.ओ) डॉक्टर तसेच पुणे , लातूर,धाराशिव,सातारा, सोलापूर,सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सर्व पायलट यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form