४ सप्टेंबर पासून पंढरपूर तालुक्यातील गावांसाठी पाणी सोडण्याचे आदेश : आ.समाधान आवताडे
पंढरपूर /प्रतिनिधी
यंदा पावसाने अपेक्षेप्रमाणे हजेरी न लावल्याने पंढरपूर मंगळवेढा आणि परिसरातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत आमदार समाधान आवताडे यांनी पुणे येथील जलसंपदा विभागाच्या बैठकीमध्ये तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी केली असता संबंधित विभागाकडून ४ सप्टेंबर पासून सोडण्याचे आदेश पारित करण्यात आले असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.
पाणी सुटल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील रांझणी,अनवली,एकलासपूर, कासेगाव,तावशी,तनाळी,खर्डी, शेटफळ,उंबरगाव,बोहाळी या गावांना पाणीप्रश्नाच्या अनुषंगाने मोठा दिलासा मिळणार आहे. पुणे येथे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील व इतर राजकीय कार्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी आणि संबधीत प्रशासकीय अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.
सदर भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उंबरगाव येथील श्री.विजय ज्ञानेश्वर पवार यांनी भाडगर कॅनॉल मध्ये पाणी सोडण्याकरीता सोनके येथे आंदोलन केले होते. आपल्या या मागणीची पाणी प्रशासन दखल घेत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गेल्या तीन तासांपासून सोनके येथील टॉवर वर आपला आंदोलन ठिय्या मांडला असल्याचे आमदार महोदय यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
पाणी व्यवस्थापनातील नियोजन अभाव व अपुरे कर्मचारी-अधिकारी यामुळे हे पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास विलंब होत असल्याबद्दल आमदार अवताडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून सुद्धा केवळ योग्य व्यवस्थेमध्ये समन्वय नसल्यामुळे हे पाणी आले नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
या बैठकीसाठी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,आ.शहाजीबापू पाटील साहेब,आ.राहुल कुल यांचेसह इतर मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
राजकीय