प्रत्येक गावात उभारणार शहीद व शूरवीरांच्या नावांचे शिलाफलक
पंढरपूर प्रतिनिधी ---
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सोलापूर जिल्ह्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान मेरी मिट्टी, मेरा देश अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. गावातील शहिदांची व शूरवीरांच्या नावाचे शिलाफलक गावात दर्शन भागात उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पत्रकार परिषदेत त्यांनी दिली त्यांनी मेरी मिट्टी, मेरा देश अभियानांतर्गत आयोजिलेल्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने पाच उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामसभा आयोजित करून मेरी मिट्टी मेरा देश अभियानासाठी गावातील माती पंचायत समिती स्तरावर नेणाऱ्या
युवकाची निवड करण्यात येणार आहे.
यावेळी गावातील देशासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची, शहीद झालेल्या सैन्यातील शहिदांचे देशसेवेसाठी कार्यरत असणाऱ्या सैनिकांच्या गौरवार्थ शिलाफलक उभारण्यात येणार आहे.
मेरी माटी मेरा देश गावात उमारण्यात आलेल्या शिलाफलकासोबत गावकऱ्यांसोबत काढलेले सेल्फी छायाचित्र केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाचे वाचनही करण्यात येणार आहे. गावात ७५ वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रमही घेण्यात येणार आहे.
मेरी मिट्टी, मेरा देश अभियानांतर्गत प्रत्येक गावातील माती पंचायत समिती स्तरावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर पंचायत समितीत प्रत्येकी एक मातीचा कलश दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या अमृतबाटिका कार्यक्रमासाठी नेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक पंचायत समिती स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली असल्याची जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
Tags
शासकीय