श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने पंढरपूर येथे ऊस पिक परिसंवाद २०२३ संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी --
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.अभिजीत धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचे वतीने सदगुरु मंगल कार्यालय, वाखरी, ता. पंढरपूर येथे आज रविवार दि. २३.०७.२०२३ रोजी पहिल्या सत्रामध्ये कृषीरत्न मा.डॉ. संजीवदादा माने ऊस तज्ञ कृषिभूषण व मा. भागवत सरडे तालुका कृषि अधिकारी, मंगळवेढा व मा. सुर्यकांत मोरे, तालुका कृषि अधिकारी, पंढरपूर यांचे उपस्थितीत ऊस पिक परिसंवाद २०२३ संपन्न झाला. याप्रसंगी श्री विठ्ठल प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या शुभहस्ते करून कार्यक्रमास सुरूवात झाली.
याप्रसंगी कृषिरत्न डॉ. संजीवदादा माने मार्गदर्शन करताना म्हणाले की, श्री विठ्ठल कारखाना २ हंगाम बंद असूनही अल्पावधीत कारखाना चालू करून ७ लाखाहून अधिक गाळप केलेमुळे कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचे कौतुक केले. यापूर्वी कै. बाबुराव फाळके हे सर्वांत जुने कृषितज्ञ होते, त्यांचे मार्गदर्शनानुसार ऊसाचे पिक घेतले जात होते व पाडेगांव, व्ही.एस.आय. पुणे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अशा ठिकाणी जाऊन ऊस तज्ञांबरोबर चर्चासत्र घडवून आणून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येत होते. व्ही.एस.आय. पुणे यांच्या नव-नवीन संशोधनामुळे शेतकऱ्यांचे एकरी १०० मे. टनापेक्षा जादा उत्पन्न निघू लागले. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी १०० मे. टनापेक्षा जादा उत्पन्न मिळविणेसाठी शेतकऱ्यांना सर्वतोपरी माहिती देणेस मी तयार असल्याचे सांगितले.
तसेच यावर्षी उन्हाळ्यामध्ये ऊस पिकांना पाण्याची कमतरता भासल्यामुळे ऊसाला कमी फुटवे, ऊसाची कमी वाढ, हवामानातील बदल यामुळे एकरी ऊस उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. परंतु सध्या पाऊस चांगला पडत असल्यामुळे ऊस वाढणेसाठी सध्याचे हवामान अनुकूल असून शेतकऱ्यांनी खताची योग्य मात्रा देऊन ऊसाची वाढ करणेसाठी वाव आहे. तसेच सर्व शेतकन्यांनी ८६०३२ या जातीचे येणेची निवड करून जास्तीत जास्त लागण केल्यास त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळून कारखान्याचीही रिकव्हरी वाढणेस मदत होते.
ऊसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळविणेसाठी पुढील ५ नियमांचा वापर केल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळून आर्थिक फायदा होणार आहे. १) जमीनीची सुपिकता, २) ऊस लागणीची योग्य पध्दत, ३) रासायनिक खताची योग्य मात्रा, ४) पाण्याचे योग्य व्यवस्थापन व ५) पिक संरक्षण याबाबत त्यांनी विस्तृतपणे शेतकऱ्यांना पटेल, समजेल या भाषेमध्ये माहिती दिली.