*शेतकऱ्यांना "विठ्ठल" पावला*
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आज पासून मिळणार थकित ऊस बिलाची रक्कम
पंढरपूर ----(विनोद पोतदार)
शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखला जाणारा पंढरपूरचा श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना, चेअरमन श्री. अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षा नंतर नव्या जोमाने सुरू होत आहे.
आज विठ्ठल कारखान्याने सभासदांच्या थकीत बिलाची रक्कम अदा करण्यास सुरुवात केल्यामुळे कारखान्याचे सभासद शेतकरी समाधानी झाले आहेत, आणि *बरं झालं विठ्ठल पावला* म्हणू लागले आहेत.
साधारण दोन महिन्यापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली, या निवडणुकीत राजकारणात नवखे असलेले पण व्यवसाय आणि उद्योग यांनी अनुभवी झालेले अभिजीत पाटील यांनी निवडणुकीत प्रस्थापित मंडळींना पराभूत करून विजय संपादित केला. जिल्ह्यातच नाही तर राज्यात अभिजीत पाटलांच्या नावाची चर्चा सुरू झाली. सर्व पक्षांचे नेते अभिजीत पाटलांना आपलेसे करण्यासाठी प्रयत्न करू लागले. काही दिवसापूर्वी त्यांच्या या लोकप्रियता, विकास व राजकीय वाटचाल याला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांच्या सर्व उद्योग, व्यवसाय, सर्व संस्था व घरी ईडीने चौकशी केली. चौकशीअंती काहीही निष्पन्न झाले नाही. अशा सर्व त्रासातून अभिजीत पाटलांनी विठ्ठल कारखान्यासाठी आर्थिक तरतूद करून सभासदांना दिलेला शब्द वेळेआधीच पूर्ण केला. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकी प्रचारादरम्यान पाटील यांनी कारखान्याची मोळी पडण्याच्या आधी सर्व सभासदांची थकीत असलेली बिले अदा केली जातील असे वचन दिले होते, कारखान्याचा हंगाम सुरू होण्यास अजून वेळ आहे त्या आधीच अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांची बिले डीव्हीपी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत जमा केली आहेत. ही माहिती देण्यासाठी त्यांनी आज विठ्ठल कारखान्यावर पत्रकार परिषद घेऊन कारखान्याच्या बाबतीतील सर्वच प्रगतीपथावरील कामांची माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, शेतकरी संघटनेचे तानाजी बागल, दीपक भोसले, सचिन पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विष्णू भाऊ बागल हे हजर होते.
यावर्षीपासून विठ्ठल कारखाना पूर्ण क्षमतेने चालू होणार आहे. त्यासाठी ऊस तोडणी यंत्रणा, कारखान्यातील मशिनरी अद्यावत करण्याची यंत्रणा, अशा सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील आगामी होणाऱ्या सर्व निवडणुका *विठ्ठल परिवार* लढणार असल्याचे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले. ग्रामीण भागाबरोबरच पंढरपूर शहराच्या विकासाकरिता विशेष लक्ष घालणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. शहराचा विकास होत असताना विकासाच्या आडवे कोणीही येऊ नये असे आवाहन पाटील यांनी केले. श्रीक्षेत्र पंढरपूर हे *तीर्थक्षेत्र पर्यटन* स्थळ म्हणून विकसित करण्याची गरज पाटील यांनी व्यक्त केली. आमचे संबंध सर्वच राजकीय पक्षांशी व त्यांच्या नेत्यांशी चांगले आहेत, त्याचा उपयोग पंढरपूरच्या विकासासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.