पंढरपूर प्रतिनिधी-
पंढरपूरच्या आषाढी यात्रेमध्ये दरवर्षी शासनाच्याद्वारे आरोग्य शिबिर मोठ्या प्रमाणात भरवले जाते. मात्र तांत्रिक अडचणी आणि मनुष्यबळाच्या अभावी यंदा आरोग्य खात्याने शासनाच्या वतीने पालखीतळ येथे 'चरण सेवा उपक्रम' आयोजला आहे. या शिबिरामध्ये इंदापूर येथील जय नर्सिंग इन्स्टिट्यूट आणि पंढरपूर येथील राजमाता जिजाऊ नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी, चालत येणाऱ्या भाविकांच्या पायाला आयुर्वेदिक तेल लावून मसाज करून वारकऱ्यांची सेवा दरवर्षीप्रमाणे सुरू ठेवली आहे. ही सेवा नवमी आणि दशमी दिवशी वाखरी येथील पालखीतळासमोर शासनाच्या आरोग्य केंद्र मध्ये सुरू राहील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जयवंत नायकुडे यांनी दिली.
आषाढी यात्रा पायी पालखी सोहळ्यामध्ये सुमारे २०० ते ४०० किलोमीटर अंतर पायी चालत येणाऱ्या भाविकांच्या दिंड्या पालखी सोहळ्यात सामील होतात. अखंडित चालून दमलेल्या भाविकांच्या पायाच्या वेदना कमी करण्यासाठी पंढरपूर येथील राजमाता नर्सिंग स्कूल इंदापूर येथील जय नर्सिंग इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये परिचारिका ANM व GNM प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष सेवा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक तेल लावून मसाज दिला आहे. शासनाच्याद्वारे आयुर्वेदिक औषधे व तपासणी केंद्र देखील या सोबतच वारकऱ्यांना मोफत सेवा देत आहे.
यावर्षी आरोग्य शिबिर उभारता येणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर, महाराष्ट्र राज्य शासन व आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने पंढरपूर येथील वाखरी तळाजवळ आरोग्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी, आयुर्वेदिक औषधे तसेच चरण सेवा देण्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार नियोजन करून पंढरपूर व इंदापूर येथील विद्यार्थिनींनी आरोग्य सेवा अर्पण केली. सदर चरण सेवा शिबिर आयोजित करण्यासाठी जयंत नायकुडे ऋषी नायकुडे, डॉ. शिणगारे, नवनाथ कतकडे यांनी परिश्रम घेतले.
Tags
सामाजिक वार्ता