प्रणिती शिंदे यांच्या मागणीची घेतली दखल, भीमा नदीकाठच्या गावांना ६ तास वीज पुरवठा ....

जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभाग व जलसंपदा विभागाकडून अहवाल मागवले 
सोलापूर प्रतिनिधी --
भीमा नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे. मात्र, नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तासच सुरू असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल प्रशासनाने घेतली असून आता दररोज 6 तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे.

*भीमा नदीकाठचा वीज पुरवठ्याचे तास वाढवणे बाबत अपडेट*
भीमा नदीकाठचा वीज पुरवठा हा सहा तास करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभाग व जलसंपदा विभागाकडून अहवाल मागवले आहेत. त्यांच्या अहवालानंतर शनिवारी भीमा नदीकाठचा वीजपुरवठा सहा तास करण्याबाबतचा सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे.

उजनीतून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले. मात्र, पिण्यासाठीच्या पाणीपुरवठा योजना असलेल्या बंधारा परिसरातील शेतीला केवळ दोन तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे या मंगळवेढा दौऱ्यावर असताना नदीकाठचा वीजपुरवठाबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती. 

*जिल्हाधिकाऱ्यांना लिहले होते पत्र-*

भीमा नदीकाठच्या वीज पुरवठ्या संदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी तत्काळ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्र लिहून 8 तास वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता या मागणीची दखल घेतली असून सहा तास वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठया प्रमाणात वाढली आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या घरात गेले आहे. या परिस्थितीत भीमा काठच्या पिकांना झळ बसत असताना, उजनी धरणातील पाणी सोलापूरला सोडल्याने नदीकाठचा वीजबंदचा फटका या भागातील शेतकऱ्यांना बसला आहे.

सध्या या भागातील शेतीच्या पाण्यासाठी अडचण झाली आहेच, पण त्याही पेक्षा अधिक जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. आता वीजपुरठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. तसेच प्रणिती शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तत्काळ दखल घेऊन त्याची सोडवणूक केल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form